प्रतिनिधी रावेर
रावेर व यावल तालुक्यात सोमवारी सायंकाळी आलेल्या जोरदार वादळ व वादळी वाऱ्यांमुळे शेतीपिकांसह घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक गावांतील जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकरी वर्गासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.
विशेषतः केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे वृत्त असून काढणीच्या टप्प्यावर आलेली पिके वादळाच्या तडाख्यात सापडल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे घरांवरील पत्रे उडून गेल्याने मालमत्तेचेही नुकसान झाले आहे.
या गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घेत रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांनी महसूल, कृषी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नुकसानग्रस्त भागांची त्वरित पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या वादळ सुरू असल्याने प्रत्यक्ष पाहणी करणे शक्य नसले तरी उद्या सकाळपासून प्रशासनाकडून गावनिहाय पाहणी करून पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अचूक मूल्यांकन करून शासनाकडून तत्काळ मदत मिळावी यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही आमदार जावळे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
"वादळामुळे नुकसान झालेल्या शेतकरी व नागरिकांना शासनाची मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रशासनाच्या सतत संपर्कात आहोत. कोणत्याही नुकसानग्रस्त व्यक्तीवर अन्याय होऊ दिला जाणार नाही," असे आमदार अमोल जावळे यांनी सांगितले.
दरम्यान, उद्या सकाळपासून नुकसानग्रस्त भागांची पाहणी व पंचनामे युद्धपातळीवर सुरू करण्यात येणार असून शासनाकडे मदतीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.